पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त करा   

माधुरी मिसाळ यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाबाबत गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने गंभीर तक्रारी येत आहेत. याबाबतची दखल नगरविकास
राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी घेतली आहे. मिसाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बाजार समिती बरखास्त करण्याची मागणी केली आहे. 
 
कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार हा चुकीच्या पद्धतीने सुरू आहे. संचालक मंडळाबाबत चौकशीचे आदेश तत्कालीन पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले होते. बाजार समितीकडून व्यापारीवर्गाकडे अतिरिक्त शुल्काची मागणी केली जाते़. यामुळे व्यापारी वर्गाकडून संचालक मंडळ बरखास्त करून या ठिकाणी पुन्हा प्रशासकाची नेमणूक करावी, असे मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात माधुरी मिसाळ यांनी म्हटले आहे.
 
पर्वती मतदारसंघातील कृषी उत्पन्न बाजार समिती ही दाट लोकवस्ती असलेल्या ठिकाणी असून, गेली अनेक वर्षे कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज हे प्रशासकाच्या नियंत्रणाखाली होते. त्यामुळे सामान्य नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नव्हता. मात्र कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संचालक मंडळ स्थापन झाल्यापासून नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मोठ्या प्रमाणात अनधिकृत मोठ्या इमारतींची बांधकामे सुरू आहेत. 
 
मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर झोपड्या, रस्त्यावर बसणारे विक्रेते अनधिकृत स्टॉल, दुकाने, बेकायदेशीर होर्डिंग्जमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. अवजड वाहने ये-जा करतात व ही अवजड वाहने वाहतुकीच्या रस्त्यावर उभी केल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे़ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात जेथे वाहने लावण्याकरिता मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध होत्या, त्या ठिकाणी अनधिकृत स्टॉल उभारल्यामुळे सर्व वाहने रस्त्यावर उभी केली जात आहेत. यामुळे खासगी वाहनांना वाहतुकीस प्रचंड अडथळा निर्माण होतो. बाजार आवारात अनधिकृत स्टॉलधारक व फेरीवाल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यांच्याकडून होणारा कचरा हा रस्त्यावर तसाच पडून राहतो़ बाजारात सुरक्षा रक्षक अल्प प्रमाणात आहेत आणि ते सामान्य नागरिकांना दमदाटी करतात. असे मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

Related Articles